वादाशिवाय साहित्य संमेलन व्हावे!

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे मराठी भाषेतील  ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य रत्नांचे स्वागत करायला देशाची राजधानी सज्ज झाली असून या संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यावेळच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे या साहित्य संमेलनाचे उदघाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ फेब्रुवारी रोजी  ९८ व्या अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनाचे उदघाटन करणार असून यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे. हे संमेलन दिल्लीतील ताल कटोरा स्टेडियमवर होणार असले तरी उदघाटन सोहळा मात्र दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार हे असून या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राजकीय नेत्यांसोबत साहित्य रसिकही या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील अनेक राज्यातून मराठी माणूस या साहित्य संमेलनाला हजेरी लावेल असा विश्वास आयोजकांना आहे. दिल्लीत होणाऱ्या हे साहित्य संमेलन दिल्लीत राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी तर पर्वणीच ठरणार आहे. दिल्लीत बहुसंख्य मराठी भाषिक आहेत ते साहित्य संमेलनाला हजर राहणार यात शंका नाही त्यामुळेच दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही. या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चा तसेच भरगच्च कार्यक्रम होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या भाषणाकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे तसेच अनेक ठराव करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने या साहित्य संमेलनाचे वेगळे महत्व आहे त्यामुळेच हे साहित्य संमेलन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल अशी अपेक्षा साहित्य रसिक व्यक्त करीत आहेत. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण गेल्या काही वर्षापासून बनले आहे. हे समीकरण यावेळी तरी बदलावे, या साहित्य संमेलनाला कोणत्याही वादाचे गालबोट लागू नये अशी अपेक्षा साहित्य रसिक व्यक्त करीत आहेत. अजून तरी या साहित्य संमेलनाविषयी कोणताही वाद उत्पन्न झाला नाही ही आनंदाची बाब आहे. असेच वादाविना साहित्य संमेलन पार पडावे. साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा वारकरी ज्या प्रमाणे पंढरपूरची वारी न चुकता करतात त्याप्रमाणे साहित्यिकही न चुकता संमेलनाला हजेरी लावतात. साहित्य रसिकही साहित्यिकांचे विचार विचार, चर्चा ऐकण्यासाठी आतुर असतात पण दरवेळी नको त्या विषयावर वाद होतो आणि त्या वादाच्या छायेतच साहित्य संमेलन पार पडते.त्यामुळे साहित्य संमेलनाचा मूळ उद्देशच भरकटतो. माध्यमात देखील त्या वादावरच चर्चा होते त्यामुळे साहित्य रसिकांचा मोहभंग होतो. त्यामुळे वादा शिवाय साहित्य संमेलन पार पडेल याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. याशिवाय संमेलन आणखी लोकप्रिय होऊन तरुणाई या साहित्य संमेलनाकडे कशी आकर्षित होईल याचाही विचार आयोजकांनी करावा. आजचे तरुण सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करतात. तरुण वर्गाला साहित्य संमेलनामध्ये आकर्षित करायचे असेल आयोजकांनी साहित्य संमेलनाला समाज माध्यमांशी जोडावे. आयोजकांनी साहित्य संमेलनाचे सर्व अपडेट फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या सारख्या समाज माध्यमांवर द्यावीत म्हणजे तरुणाईत देखील साहित्य संमेलन लोकप्रिय होईल.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत होत असलेल्या हे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकप्रिय होऊन कोणत्याही वादाशिवाय पार पडेल ही अपेक्षा . ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा!

श्याम ठाणेदार
दौंड-जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp